केसरेकर कुटुंबियांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा विधी प्राधिकार अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्राधिकार कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक; समितीच्या मागणीची दखल…
खानापूर/ सांगली: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
मूळचे हेब्बाळ सध्या राहणार कुपवाड (सांगली)येथील मोहन केसरेकर आणि मनिषा केसरेकर दाम्पत्यांची राक्षसी प्रवृत्तीच्या अंतंकवाद्याने अमानुष हत्या केली. त्यामुळे त्यांची मुले आणि कुटुंब पोरके झाले. याप्रकरणी पिडीतांना न्याय देऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली असून, त्यांच्या दोन्हीं मुलांचे भविष्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशी मागणी बेळगांव आणि महाराष्ट्रातील संघटनांकडून करण्यात आली होती. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीनेही तशीच मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली अन् ती मान्य करण्यात आली असून, तसे पत्र सांगली जिल्हा प्राधिकार विभागाकडून तालुका म. ए. समितीला पाठवण्यात आले आहे.
त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये मूळच्या हेब्बाळच्या मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा केसरेकर यांची अमानुषपणे हत्या झाली असून, त्या घटनेने महाराष्ट्र सरकारही व्याकुळ झाले आहे. त्यातच अनेक संघटनांसह खानापूर तालुका म. ए समितीकडून केसरेकर कुटुंबियांना शासनाकडून अर्थिक मदतीसह दोन्हीं मुलांच्या भविष्याची काळजी घेतली जावी अशी मागणी करण्यात आली असून, सांगली जिल्हा प्राधिकार विभागाकडून या घटनेची दखल घेण्यात आली असून, या कार्यालयातील जे. व्हि. नवले यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत केसरेकर कुटुंबियांची काळजी घेतली जाईल असेही सदर पत्रामध्ये नोंद करण्यात आली आहे, तरी आपण संबंधित पीडित कुटुंबाला कळवावे असे आवाहनही तालुका म. समितीला करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी लोकहित न्यूज ला कळविले आहे.

सांगली जिल्हा प्राधिकारकडून राज्य प्राधिकार सचिवांना पत्र…
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अर्जाची दखल घेतली, सांगली जिल्हा प्राधिकारकडून राज्य प्राधिकार सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे, तीच माहिती तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीला पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. त्यामध्ये आमच्याच कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी जे. व्ही नेवले यांची नेमणूक करण्यात आली असल्याचाही उल्लेख समितीला दिलेल्या पत्रात नोंद करण्यात आले आहे.