Oplus_16908288
मंतुर्गा पुलाची उंची वाढवण्याची गरज ; शनिवार -रविवारी मंतुर्गा भागात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते…

खानापूर: चेतन लक्केबैलकर (लोकहित न्यूज)..
मणतुर्गा पूल पाण्याखाली, वीस गावांचा संपर्क तुटला
खानापूर तालुक्यातील खानापूर-हेम्माडगा मार्गावरील मणतुर्गानजिकचा पूल यावर्षी पहिल्यांदाच आज सकाळी पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. सदर पूलाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यंदा या पूलाच्या निर्मितीला राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखविला असून ८ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. तसेच शेतवडीला तलावसदृष्य स्वरूप आले आहे. परिणामी, यावर्षी पहिल्यांदाच मणतुर्गा पुलावर चार फूट पाणी आले आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनमोडहून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्याशिवाय शिरोली-हेम्माडगा भागातील सुमारे वीस गावांचा खानापुरशी असलेला संपर्क तुटला आहे. सध्या वाहनचालक असोगा रस्त्यावरून प्रवास करीत असले तरी हा रस्ता अत्यंत खराब असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
संपर्क तुटलेली गावे : अखेती, पाली, डोंगरगाव, शिरोली, हेम्माडगा, गवाळी, पास्टोली, नेरसा, अशोकनगर, तिओली, मणतुर्गा आणि इतर वाड्या – वस्त्या ..
गोव्याहून होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम..
बेळगाव – गोवा महामार्गाची रामनगर ते अनमोडपर्यंत अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूक नेहमी हेम्माडगा मार्गे होत असते. पण, आज पूलावर पाणी आल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. मणतुर्गा पूल हा ब्रिटीशकालीन असून ,त्याची पूनर्रबांधणी १९७१ साली झाली होती. पण, पूलची उंची न वाढविल्यामुळे दरवर्षी पूल पाण्याखाली जातो. आणि वाहतूक कोंडी होते. यंदा आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी रू. ८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी नागरीकांची आपेक्षा आहे.