एक वर्षापासून गोल्याळी पंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचे हाल, दखल न घेतल्यास मोर्चाचा इशारा..
तोराळी: लोकहित न्यूज
खानापूर तालुक्यातील बहुतेक गावात मार्च ते मे दरम्यान पाणी समस्या निर्माण होते. मात्र, जांबोटी विभागातील गोल्याळी ग्राम पंचायत हद्दीतील तोराळीवाड्यावर पंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे एका गल्लीला थेंबभर पाणी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मलप्रभा नदीला पाणी असतांनाही पंचायतीच्या डोळेझाकपणामुळे गेल्या वर्षभरापासून याठिकाणी पाणी समस्या निर्माण झाली आहे. याकाळात पंचायतीकडे अनेकवेळा पाठपुरावा,पूर्वकल्पना, निवेदन देवूनही कोणतीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी याविरोधात ता. पं. जि. पंचायततीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नुकतेच या आशयाचे निवेदन पंचायतीला दिले आहे.
मागच्या महिन्यात नागरिकांनी सादर केलेल्या निवेदनात, तोराळीवाडा येथे गेल्या वर्षापासून पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने आमचे हाल होत आहेत, परिणामी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. या काळात अनेकवेळा पांचातीला पूर्वकल्पना, निवेदन, पीडीओसह पंचायत आधिकाऱ्याना कळवूनही कोणतीच दखल घेतली जात नाही. तत्काळ याचा पाठपुरावा करून येथील पाणी समस्या सोडवा असे नमूद करण्यात आले आहे. यावर निवेदनावर श्रीकांत पाटील, मुळाप्पा कोलिकर, पावणा पाटील, सिध्देश्वर पाटील, अस्मिता पाटील, सोमांणा पाटील, ओंकार पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सद्या काय आहे येथील परिस्थीती?
सद्या नदीला पाणी असून, तेथून पाईप लाईन आहे ती सुरळीत केली तर पाणी उपलब्ध होवू शकेल. तर दुसरीकडे जलनिर्मलचीही पाईप लाईन असून तीही जोडली तरी पाणी समस्या दूर होवू शकते असे, माजी ग्राम पंचायत सदस्य पुंडलिक पाटील यांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली.
प्रतिक्रिया –
त्या गल्लीला वेगळी थेट लाईन देण्यात येणार असून, त्याचे साहित्य आणण्यात आले आहे. तत्काळ हे काम हाती येईल. पाण्याबाबत पंचायत कायम सतर्क असेल. नागरिकांनीही मध्येच मूळ पाईप तोडू नये, सहकार्य करावे..

-आनंद भिंगे, पीडीओ गोल्याळी पंचायत..
Leave a Reply