जांबोटी माध्यमिक विद्यालयात महत्वाचे मार्गदर्शन; विकासाच्या नावाखाली निसर्गाचा समतोल ढाळतोय का? असा प्रश्न श्री.कागणीकर यावेळी उपस्थित केला…

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
आपल्या देशाचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या हाती आहे सुसंस्कारित नवी पिढी घडविताना साने गुरुजींच्या विचार प्रणालीचा अवलंब करणे गरजेचे आहे. बदलत्या काळात सेवाभावी वृत्ती कमी झाली आहे त्यामुळे देशासमोर आज अनेक प्रश्न आहेत. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्या हाती नसली तरी पर्यावरण संरक्षण आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करून या सृष्टीच्या संरक्षणासाठी आपण कार्य करू शकतो. असे मत पर्यावरणवादी व समाजसेवक डॉ. शिवाजी दादा कागणीकर यांनी मांडले.
विश्वभारत सेवा समितीच्या जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
शिवाजीराव कागणीकर पुढे म्हणाले.”निसर्ग आपल्याला परोपकार शिकवितो, शुद्ध प्राणवायू, तपमानाचे नियंत्रण, आणि मान्सून हे सर्व पर्यावरणाच्या समतोलत्वावर चालणारे चक्र आहे. दुर्दैवाने विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होऊन आज त्याचे दुष्परिणाम निसर्गचक्रावर दिसू लागले आहेत. असेच सुरू राहिले तर पृथ्वीबरोबर आपला देश सुद्धा रखरखीत होईल आणि सजीव सृष्टीचा नाश अटळ होईल, त्यासाठी आज निसर्ग संरक्षणाची जबाबदारी सर्वांनीच घेतली पाहिजे.”
मोटार गाड्यांच्या अतिवापरामुळे हवामानाचे प्रदूषण होऊन निर्माण झालेल्या समस्या, ओझोनच्या थराचे नुकसान, जंगलांचा ऱ्हास, नद्यांचे प्रदूषण असे अनेक विषय त्यांनी सविस्तर मांडले. वृक्ष लागवड, पाण्याचे संवर्धन, सेंद्रिय शेती यासाठी विद्यार्थी दशेपासूनच सुरुवात व्हावी असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इशस्तवनानंतर डॉ.शिवाजी दादा कागणीकर व इतरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी परिचय करून दिला व स्वागत केले. व्यासपीठावर दिनकर पाटील, महेश साबळे, तुकाराम सडेकर, सिद्धारूढ पाटील, सुनील ठाणब , सुजाता चलवेटकर आदी होते. तुकाराम सडेकर यांनी आभार मानले.
