खानापूरहून बस सकाळी 7.30 वाजता ओलमणीत येऊन, परत खानापूर मार्गे बेळगावला धावणार; गावकरी विद्यार्थ्यांत समाधान…
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
गेल्या आठवड्यात जांबोटी -खानापूर मार्गावरील ओलमणी गावच्या विद्यार्थांना बस सोडून गेली अन् एकच इतिहास घडला, संतप्त विद्यार्थांनी आंदोलनाचा इशारा दिला, त्याला आमदार विठ्ठल हलगेकर यांचे मोठे बळ मिळाल्याने इतिहासात पहिल्यांदाच ओलमणी गावासाठी विशेष बस धावली आहे. त्यामुळे आंदोलन, लढ्यांनी बदल घडवता येतो हेच यावरून सिद्ध झाले आहे. आज सकाळी गावात ही बस येताच विद्यार्थी आणि गावकऱ्यात एकच जल्लोषाचे वातावरण पसरले होते. यासाठी अनिल (स्वप्नील) ईश्वर वाडेकर यांचे नेतृत्व लाभले असून, त्यांना गावच्या सर्व विद्यार्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

सकाळी 7.30 बस येणार; आमदारांचे विशेष आभार…
सकाळी 7.30 वाजता खानापूरहून बस ओलमणीत येणार असून, परत ती खानापूरमार्गे बेळगावला जाणार आहे. त्यामुळे सकाळी कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. या बससेवेमुळे दारोळी, मोदेकोपसह रस्त्यावर येणाऱ्या सर्वच गावांची सोय होणार आहे, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या आदेशावरून गावात पहिल्यांदाच बस येणार आहे, त्याबद्दल आमदारांचे विद्यार्थी आणि गावकऱ्यांतून विशेष आभार मानले जात आहेत….