परीक्षा शांततेत पार पडणार; कुशाग्र बुद्धीने पेपर सोडवा..
बेळगांव: लोकहित न्यूज
उद्यापासून राज्यात (एसएसएलसी) दहावी बोर्ड परीक्षेला सुरवात होत आहे. दहावी परीक्षा म्हंटले की, पहिल्यांदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांच्या मनात धाकधूक असते. काहीं विद्यार्थी आधीच भीतीने व्याकूळ होऊन जातात. यंदा विद्यार्थांना दिलासादायक वातावरण असणार आहे. अशाच शुभेच्छा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पत्राद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध केल्या आहेत.
सदर पत्रात, सीईओ राहुल शिंदे म्हणतात, विद्यार्थ्यांनो धाडसाने परीक्षेला सामोरे जा, यामध्ये भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सोपीच असते, त्यात असे भयभीत होण्यासारखे काहीच नसते. प्रश्न पत्रिका हातात पडल्यानंतर त्याचे शांतपणे वाचन करून पहिल्यांदा येणारी उत्तरे उतरून काढणे. त्यानंतर अवघड वाटणारे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. शांतचित्ताने परीक्षेतील सर्व प्रश्न सोडवा. परीक्षेचा आनंद घ्या, भीती बाळगू नका. यंदाची परीक्षा शांततेत पार पडेल, विद्यार्थांनी भीती बाळगू नये. उज्वल भविष्यासाठी दहावी परीक्षा यशाची पहिली पायरी आहे. अलीकडच्या काळात शिक्षण खात्याने सोप्या पद्धतीने परीक्षेचे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थांनी हसत खेळत ही पहिली पायरी पार करावी असेही आवाहन शिंदे यांनी पत्राद्वारे केले आहे.

Leave a Reply