मलप्रभेला पाणी आले असून आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम वाढल्यास,कुसमळीजवळील पर्यायी पुल वाहून जाण्याची भीती..
जांबोटी: लोकहित न्यूज
गेल्या आठवड्यापासून जांबोटी भागांसह देशाच्या काहीं राज्यात सुरु असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे चारच दिवसात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, महिनाभर कोरड्या पडलेल्या नदी- नाल्यांना पाणी आले आहे. मलप्रभा नदी प्रवाहित झाली असून, आणखी काहीं दिवस पावसाचा मुक्काम वाढल्यास बेळगांव – व्हाया जांबोटी चोर्ला पणजी मार्ग बंद पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. परिणामी कुसमळीजवळ मलप्रभा नदीवर असलेले ब्रिटिशकालीन पुल पाडून त्याठिकाणी नविन पुलाची उभारणी करण्यात येत आहे, त्यामुळें पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूलाच लहान पाईप टाकून छोटे पुल काढण्यात आले होते. मात्र,पावसामुळे नदीला पाणी अले असून,ते सदर लहान पुलाला लागून वाहत आहे. परिणामी आणखी काही दिवस पाऊस असाच कायम राहिल्यास या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. तसे तशी परिस्थीती निर्माण झाल्यास बेळगांव – व्हाया जांबोटी चोर्ला पणजी मार्ग बंद पडण्याची शक्यता आहे. सद्या सुरू असलेल्या पुलाचे काम अर्धे झाले असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी दीड महिन्याचा कालावधी आवश्यक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुलाचे बांधकाम कुठपर्यंत?
सदर नवीन पुलाला एकूण सहा दरवाजे ठेवण्यात आले असुन, त्यापैकी तीन दर्वाजांचे स्लॅब पडले आहे. तर तीन दरवाजांवर स्लॅब टाकण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळें तयारीसाठी पंधरा दिवस गेले तर स्लॅबसाठी महिना असा एकूण दिड महिन्याचा कालावधी अजून आवश्यक आहे. तोपर्यंत पावसाचे प्रमाण कमी झाले तर पर्यायी पुलावरून आणखी काही दिवस वाहतूक चालू शकेल, नाही तर तब्बल दोन ते दिड महिना जांबोटी -चोर्ला पणजी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागेल.
….पुलाचे काम लवकर पूर्ण करा; आमदारसाहेब जरा पाठपुरावा करा ना…
जांबोटी आणि गोव्यासाठी महत्वाचा मार्ग म्हणून चोर्ला मार्गाची ओळख आहे. त्यामुळें हा मार्ग सुस्थित राहण्याची गरज आहे. या मार्गात येणारे मलप्रभेवरील कुसमळी जवळील पुल म्हणजे बेळगांव आणि जांबोटी चोर्ला मार्गाला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या पुलाचे बांधकाम सूरू आहे. मात्र, अचानक मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. तर येत्या पंधरा दिवसात मान्सून पाऊस धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळें या पुलाचे काम लवकर लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. काहीं दिवसापूर्वी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खा. विश्वेश्वर हेगडे , आ. विठ्ठल हलगेकर तसेच जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी या पुलाची पाहणी केली आहे. पण, तरीही आमदारांनी यापुढेही या पुलाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. कारण या पुलाचे काम दोन महीन्यात न झाल्यास चोर्ला मार्गावरील वाहतुकीचा भार जांबोटी – खानापूर तसेच बेळगांव बैलुर रस्त्यांवर पडणार आहे. यामुळें मोठी समस्या निर्माण होण्याची भीती आहे.
चौकट –
रवीवारी दोन्हीं बाजूने मार्ग बंद ठेवण्यात आला होता…
कुसमळी पुलाचे काम सुरू असल्याने बाजूलाच पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीचे पाणी जाण्यासाठी छोटे पाईप टाकण्यात आले आहेत. रविवार नदीला पाणी आल्याने सर्वांचीच दमछाक उडाली. त्यामुळें या दिवशी बेळगांवहून येणारी वाहतूक कुसमळीतून परत पाठवली तर जांबोटीहून बेळगांवकडे जाणारी वाहतूक खानापूर रस्त्याने वळविण्यात आली…
प्रतिक्रिया –
कुसमळी पुल बेळगांव -चोर्ला बरोबर जांबोटी भागासाठी वाहतुकीसाठी मोठा आधास्तंभ आहे. त्याचे काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. यासाठी आम्हीही वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत.
-आरोही अनंत सावंत, ग्रा. पं. अध्यक्षा बैलुर पंचायत..


Leave a Reply